Sunday, May 16, 2021

सुजीत भोगले भाग्यलक्ष्मी देवी

 #ब्रह्ममुहूर्तचिंतन 

भाग्यदालक्ष्मीबारम्मा नम्ममामि 


काल मी एक राजा भय्या यांचा व्हिडियो शेअर केला होता. त्यात त्यांनी हैदराबाद मधील त्यांच्या कार्याचा परिचय दिला. थोडा त्यापूर्वीचा इतिहास मी सांगतो. कुली कुतुबशहाने सोळाव्या शतकात भाग्यनगरचे हैद्राबाद केले. चारमिनार बनवला मक्का मस्जिद बनवली. भाग्यनगरीची ग्रामदेवता म्हणजे भाग्यलक्ष्मी देवी. हैद्राबाद किंवा भाग्यनगरला असलेली समृद्धी मुस्लिमांच्या भाषेत बरकत जी आहे त्याला कारण ही देवी आहे. सतराव्या शतकात निजामशाही आली. निजाम हे आधीच्या राजवटीपेक्षा अधिक क्रूर होते. त्यांच्या धार्मिक उन्मादाने समस्त हिंदू त्रस्त झाले. 


त्याकाळात हैद्राबादचे प्रवेशद्वार म्हणजे चारमिनार होते. एका पहाटे त्या दारावरील रक्षकाला एक अत्यंत सुंदर स्त्री जिने भरपूर दागिने ल्यायले आहेत नगरीच्या दारातून बाहेर जाते आहे असा भास झाला. त्याने तिला तत्काळ अडवले. तू कोण आहेस आणि तू कुठे जाते आहेस असे विचारले ? देवीने त्याला सांगितले मी या नगरीची भाग्यदेवता आहे. हा निजाम आपल्या प्रजेवर खूप अत्याचार करतो आहे हे मला पहाणे शक्य नाही म्हणून मी हे नगर सोडून जाते आहे. 


मुस्लीम रक्षक असला तरीही नगराची भाग्यदेवता सोडून जाणे याचा अर्थ त्याला समजला. त्याने विनवणी केली, मी आमच्या निजामाला जाऊन सांगून येतो तू तोवर इथून जाऊ नकोस. देवीने मान्य केले. तो रक्षक धावत निजामाकडे गेला आणि त्याने निजामाला झोपेतून उठवून हे सारे सांगितले. त्याचे सांगणे संपताक्षणी त्या निजामाने त्याचे मस्तक उडवले. रक्षक परत जाणार नाही. देवी पण नगर सोडणार नाही, विषय संपला. त्या देवीचे शिळारूप चारमिनारच्या एका स्तंभाला खेटून आहे. भाग्यलक्ष्मी हैद्राबादची भाग्य देवता म्हणून तिची त्या शिळारुपात पूजा होत असे. पुढे स्वातंत्र्य मिळताच तिथे मूर्ती स्थापन झाली. हैद्राबादमधील प्रत्येक नागरिकाची श्रद्धा आहे की ती जोवर तिथे आहे हैद्राबादला बरकत आहे. 


२०० वर्षाची निजामशाही त्या मंदिराला हात लावू शकली नाही. ओवेसी ब्रदर्सचा गेली कित्येक वर्षे भाषणातून वारंवार धमकी देतात आम्ही ते मंदिर उध्वस्त करू. त्या मंदिराला कोणीही हात लावू शकला नाही. आज सुद्धा हैद्राबाद मध्ये हिंदू अल्पसंख्याक किंवा ५० / ५० असतील. पण त्या मंदिराला कोणीही हात लावू शकत नाही. तुम्ही चारमिनारचा कोणताही फोटो पहा. चौथा खांब दिसेल असा फोटोच नाही कारण तिथे या देवीचे मंदिर आहे.


एरवी नित्य चेपला जाणारा हैद्राबाद मधील हिंदू या मंदिराच्या बाबतीत कडवट आहे याची प्रत्येक मुस्लिमाला जाणीव आहे. निजामांना सुद्धा होती. या मंदिराला हात लागला तर आपण संपू ही साधार भीती आहे. त्यामुळे अक्षरशः चारही बाजूंनी पाच किलोमीटर च्या परिघात हिंदू लोकसंख्या १० % सुद्धा नसेल मंदिर “डंके की चोट पे” सुरक्षित आहे. ही धार्मिक श्रद्धेची ताकद असते. 


आपला आणि मुस्लिमांचा संघर्ष धार्मिक आहे. त्यामुळे आपल्या धार्मिक प्रतीकांना उध्वस्त करणे हेच त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असते. त्यांचे संरक्षण हे आपले उद्दिष्ट असते. पण काही ठिकाणी हे सगळेच गणित उलट होते. जिथे हिंदू अल्पसंख्यांक होऊ लागतो तिथे ही प्रतीके अस्मितेचे स्वरूप होऊन जातात. यांना हात घातला तर पेटणारी आग हाताळण्याचे धाडस आपल्यात नाही हे मुस्लिमांना सुद्धा मान्य करून गप्प बसावे लागते. ही दहशत हैद्राबादच्या हिंदूंनी कायम ठेवली आहे. राजा भय्या आज आहे. पण गेली कित्येक दशके हैद्राबाद मध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक निघते त्या मार्गावरील सगळ्या मशिदी पूर्ण नखशिखांत झाकून टाकल्या जातात कारण गुलाल हा त्या भागातून जाताना तर आवर्जून काही टन उडवला जातो. 


दंगली होतात आणि दंगलीत सुद्धा हिंदू पूर्ण ताकदीने प्रतिकार करतात आणि म्हणून अल्पसंख्यांक असून सुद्धा तिथे हिंदू सुरक्षित आहे. आज राजा भय्या जे करतो आहे त्याचा पाया तेथील हिंदूंनी खूप आधीपासून घालून ठेवला आहे. 


हैद्राबाद मध्ये एक मोठा तलाव आहे. मुस्लीम लोक त्याला हुसेन सागर म्हणतात कारण ते मोहरम चे ताबूत त्या तलावात विसर्जित करतात. हिंदू गणेश तलाव म्हणतात कारण ते गणेश विसर्जन त्या तलावात करतात. यांच्यातील त्या नावावरून सुद्धा भरपूर डोकी फुटली आहेत म्हणून सरकार ने तिथे मोठी बुद्ध मूर्ती उभी केली पण नावे अजूनही तीच वापरली जातात. 


सांगण्याचा मुद्दा हा आहे की धर्मरक्षण करायचे असेल तर रक्षण करायला प्रतिक लागते आणि ते प्रतिक आपली श्रद्धा व आपले अस्तित्व ज्याच्याशी एकरूप होऊ शकेल असे असावे लागते. हिंदूंचा द्वेष करणारा कोणीही असला तरीही तो मूर्तीरुपी प्रतीके, उपासना पद्धती यांच्या बद्दलच प्रश्नचिन्हे उपस्थित करतो कारण ही मूर्त प्रतीके आहेत ज्यांच्यावरील श्रद्धा डळमळीत झाली की तेथील हिंदूंना वश करणे सोपे जाते. 


नेमके हे षड्यंत्र समजून घेण्यात आजचे हिंदुत्ववादी अपयशी होत आहेत. त्याला कारण आहे macalay चे गेले २०० वर्षात मिळालेले शिक्षण. मूर्तींच्या आणि मंदिरांच्या पलीकडे जाऊन आम्ही नवीन प्रतीके देऊ आणि आम्ही धर्म संरक्षण करू आणि सर्व हिंदू बांधवांना एकत्र आणू हा अट्टाहास ते करत आहेत. 


माझा मुद्दा सोपा आहे ज्या प्रतिकांनी आजही हिंदू बांधून ठेवला आहे ज्या प्रतिकांनी हिंदू आजही कोणतीही जात असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन घट्ट जोडला गेला आहे तेच प्रतिक वापरा . अजून वेगळी शोधण्यात वेळ आणि उर्जा घालवता कशाला ??? 


त्यांचा असा गैरसमज आहे की दारिद्र्य लोकांना धर्मांतराला उद्युक्त करते. काही अंशी हे ठीक आहे. परंतु असे धर्मांतर किती स्थिर आहे हे तुम्ही जमिनीवर जाऊन पाहिले आहे का ? 


Rice bag conversion कागदावर होत असते. त्याच्या व्यावहारिक उपयोग तोवर शून्य असतो जोवर त्यांच्यात जाऊन एखादा पाद्री त्यांना लढायला उचकवत नाही.डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायी मंडळींनी धर्मांतर केले. काय परिणाम झाला. माझ्या परिचयात असे बौद्ध व्यक्तीचे घर नाही ज्याचा घरात स्वामी समर्थ किंवा आपल्या एखाद्या गुरूचा फोटो नाही, गणेशाची किंवा देवीची मूर्ती वा फोटो नाही. अन्य देवांच्या जोडीला अजून दोन देव जोडले गेले बुद्ध आणि आंबेडकर. 


गेल्या ६० वर्षातील प्रचार त्यांच्या डोक्यातून हिंदू धर्म, संस्कार आणि आपले देव काढू शकला नाही. फेसबुक वरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत जे बौद्ध आहेत. प्रकट मध्ये पण तसेच दाखवतात. पण मला सांगतात लग्न झाले पाच वर्ष होऊन गेले मुल होत नव्हते. काळूबाईला जाऊन आलो मगच सगळे मार्गी लागले. हे एक नाही अशी शेकड्यांनी उदाहरणे देतो अशी बौद्ध मंडळी ज्यांनी धर्मांतर केले आणि आज त्यांना साक्षात्कार होतोय गपचूप जाऊन आपल्या कुलदेवतांचे आणि परंपरांचे पालन करत आहेत. गावातील जत्रेत जात आहेत तिथे जत्रेतील असलेला परंपरागत आपापल्या जातीचा मान घेत आहेत आणि त्यात अभिमान सुद्धा बाळगून आहेत. वास्तव जीवनातील हे कटू सत्य ज्ञात असल्यानेच बौद्ध हे इस्लाम पेक्षा जास्त हिंदूंचा द्वेष करतात आणि भाऊ कदम यांच्या सारखे प्रकार घडतात किंवा सोशल साईट वर सुद्धा हिंदू द्वेष करणारे बहुसंख्य लोक आपल्याच घरातील हे हिंदू धर्मपालन बंद करू शकत नाहीत  


आजही गावातील जत्रा, यात्रा याच गोष्टी समस्त गावाला एकत्र आणतात संपूर्ण गाव जातीभेद विसरून एकजीव होऊन काम करतो. गावाचे कार्य संपले की जातीभेद आणि आपापसातील मारामाऱ्या सुरु. आजही कुठेही भंडारा असेल , सत्यनारायण असेल, गणपती असेल तिथे सर्वांना मुक्त प्रवेश असतो. सगळेजण एकत्र येऊन आनंदाने तो प्रसंग साजरा करतात. 


पंढरीची वारी करणारे लक्षावधी सर्वजातीय वारकरी कोणतेही आमंत्रण नसताना, कोणतेही प्रलोभन नसताना खिसा तर इतका फाटका कि दर्शन घेतल्यावर जेमतेम गावी परत जाण्याचे बस चे पैसे असतात अश्या अवस्थेत सुद्धा गेली ७०० वर्ष ही धर्माचीच पायवाट तुडवत आहेत. त्या निमित्ताने भेदाभेद अमंगळ हे जिवंतपणे अनुभवत आहेत.  


आपल्याला जर धर्म कार्य करायचे असेल, आपल्याला आपल्या संपूर्ण समाजाला जातीभेद विसरून जाऊन एकत्र आणायचे असेल, जर आपल्याला आपल्या संपूर्ण समाजाला एकत्र आणून भविष्यातील संघर्षासाठी सिद्ध करायचे असेल तर हे संपूर्ण नेटवर्क तयार आहेच ना. 


तुम्हाला फक्त तुमच्या आणि त्यांच्या मेंदूतील ब्रिटिशांनी घातलेला विघटनाचा विचार जो त्यांच्या शिक्षणातून तुमच्या मेंदूत झिरपला आहे तो बाजूला सारायचा आहे. आपोआप ती ताकद उभी रहाते. त्या माध्यमातून निर्माण होणारी ताकद चिरकाल टिकते आणि तिचा समाजावर अधिक सखोल परिणाम होतो. 

  

धर्म रक्षणार्थ हिंसा ही संकल्पना कशी विकसित झाली याचे माझे चिंतन सांगतो. 


मी नेहमीच म्हणतो की एक विशिष्ट पात्रता तुम्ही अर्जित केली की वैश्विक चेतनेकडून तुम्ही ज्ञान मिळवण्यास पात्र होता. मग त्याला आपण शब्दबद्ध करताना वेदांच्या रुपात करतो, पैगंबर कुराणच्या रुपात आणि ख्रिस्ती बायबलच्या रूपाने पण प्रोसेस सेम आहे. आता या प्रोसेस मध्ये तुम्हाला सगळे काही समजावून सांगितले जात नाही. तुमच्या मनातील प्रश्नाला बीजमंत्राच्या सारखे एक अक्षरी किंवा फार तर फार एखादा शब्द या रुपात ज्ञान दिले जाते. विस्तार तुम्ही करायचा. 


आता सर्वच धर्मातील विचारवंतांना धर्म रक्षण किंवा विस्तार करण्यासाठी सुद्धा एकच शब्द/ धातू मिळाला हिंस हा तो धातू. त्याचा अर्थ इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माने कसा काढला ? तर धर्माचे रक्षण आणि प्रसार करायचा असेल तर हिंसा करणे आवशयक आहे आणि मग त्यात कोणताच विधिनिषेध बाळगण्याची गरज नाही. या विचाराचे प्रकटीकरण त्यांच्या धर्मग्रंथात आणि नंतर कृतीत झाले आहे. जो जगाचा इतिहास आहे. त्यांनी धर्माला बळाच्या वापरातून विस्तारणे शीरगणती आणि भूमी वाढवणे असे राजकीय स्वरूप दिले. मूळ विचाराचा हा विस्तार त्यांच्या प्रवृत्तीचे प्रकटीकरण आहे जी एखाद्या तरसाच्या किंवा जंगली कृत्यांच्या टोळीची असेल. 


त्याचे कारण या धर्मांचा उदय ज्या कालखंडात आणि क्या भौगोलिक परिस्थितीत झाला त्या परिस्थितीत त्यांच्या प्रेषितांवर त्या सर्व परिस्थितीचाच प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी धर्माला शब्दबद्ध करताना टोळ्यांची मानसिकता समजून घेऊन त्याला शब्दबद्ध केले. याचा परिणाम जगासमोर आहे. 


तरस आणि जंगली कुत्र्यांची वृत्ती असल्याने या धर्मांनी स्वतःचे प्रार्थनास्थळ बनवताना सुद्धा नवीन बनवले किंवा बांधले नाही. ज्यांची संस्कृती , ज्यांचे मंदिर उध्वस्त केले ते विजयप्रतिक मानून त्यालाच ते लोक पूजतात. 


हिंदू धर्मातील विचारवंत शुद्धत्वाच्या परम अवस्थेला प्राप्त होते त्यांना सुद्धा हिंस हाच धातू मिळाला. त्यांनी त्याला विरुद्ध प्रत्यय करून सिंह केले. त्या सिंहाला सुद्धा त्यांनी देवीचे वाहन केले. 


सिंहारूढ देवी प्रकट कधी होईल ? देव संपूर्ण पराभूत झाल्यावर. 


का प्रकट होईल? तर दुष्टांचा विनाश करून सज्जनांचे रक्षण करण्यासाठी. 


कशी प्रकट होईल ? चित्ताच्या अग्निकुंडात तुम्ही सर्व कामनांची आहुती दिल्यावर. 


आपल्या ऋषींनी समाजाला फुलप्रूफ सिस्टीम दिली आहे. क्षत्रियांना धर्म म्हणून जी चौकट आखून दिली आहे त्यात हिंसा समाविष्ट आहे. पण अशी आंधळी निरंकुश हिंसा करण्याची त्यांना परवानगीच नाही. त्यानं नैतिक चौकट सुद्धा दिली आहे की संघर्ष आणि हिंसा करताना सुद्धा संयम कुठे आणि कसा बाळगावा. 


पण या सगळ्यामुळे आपले धर्मरक्षक क्षत्रियांना मानसिक पातळीवर प्रचंड असे नैतिक अधिष्ठान प्राप्त होते ज्याच्या बळावर लढणारा योद्धा हा अफाट पराक्रम करू शकतो कारण त्याच्या लढ्याला ईश्वरी अधिष्ठान प्राप्त आहे.


वृत्ती या पातळीवर सुद्धा आपल्या धर्माने या योद्ध्यांना तुम्ही सिंह आहात याची जाणीव करून दिलेली आहे. सिंह खुल्या मैदानात शिकार करतो आणि तेच अन्न खातो. तरस आणि जंगली कुत्री ही टोळीने असतात आणि ते घात लावून , दगा करून भक्ष्य मिळवतील किंवा मेलेले जनावर खातील किंवा सिंहाने मारलेल्या आणि भक्षण केलेल्या उष्ट्या अन्नाला संपवतील. 


इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचे विस्तार करतानाचे वर्तन नेमके तसेच आहे. आपल्यात अल्पसंतुष्टी हा दोष निर्माण झाला आणि त्यामुळे सिंह असूनही आपण आपले जंगल राखू शकलो नाही. ज्या देशात अश्वमेध यज्ञ परंपरा होती तेथील राजे अल्पसंतुष्ट झाल्याने त्यांना ना राज्य राखता आले ना धर्म. हा दोष आपण समजून घेतला पाहिजे. धर्मविस्तार आपण करणार असलो तर आपण तो सिंहाच्या वृत्तीनेच केला पाहिजे हे पण आपण समजून घेतले पाहिजे. 


सिंह या प्राण्याचेच प्रतिक का दिले आहे त्याचे पण कारण सांगतो आणि देव पराभूत झाल्यावर दुर्गा का प्रकटते ते पण सांगतो. सिंहाला शिकार करताना पहा. संपूर्ण तयारी टोळीतील मादी करते. सिंह फक्त अंतिम घाव घालतो. त्यात सुद्धा सिंह दिवसातील बहुसंख्य वेळ झोपेत घालवतो परंतु तो एकदा जागृत झाला की त्याच्यासमोर जंगलात कोणीही उभा राहू शकत नाही म्हणून त्याला जंगलाचे राजेपद दिले आहे. सिंह म्हातारा झाला तरीही स्वतःची शिकार स्वतःच करेल. त्याला कधीही तरस किंवा जंगली कुत्र्यांच्या सारखे वागणे जमणार नाही. त्यामुळे या प्राण्यांच्या टोळ्या असल्या तरी एकटा सिंह त्याना भारी पडतो. कारण त्याला स्व क्षमतेची सार्थ जाणीव आहे. 


आपली एक हिंदू म्हणून असलेली ही स्वक्षमतेची जाणीवच ब्रिटीश शिक्षणातून नष्ट झाली आहे. म्हणून आपण आजच्या जीवनात समस्यांनी ग्रस्त आहोत. आपल्याला परत एकदा कोणीतरी तू सिंह आहेस हे आत्मज्ञान देणे आवश्यक आहे. हे कार्य धर्मच करू शकतो. ही ठिणगी धर्मच टाकू शकतो. धर्माचे आत्मज्ञान स्वरूप हे नेत्याला माहिती असणे पुरेसे आहे अनुयायी मंडळी प्रतीकांना पुजून आणि त्यांच्या रक्षण व समृद्धीसाठी लढण्यास उद्युक्त होतात हा इतिहास आहे. 


हे सर्व मर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसात केले होते आणि म्हणून त्यांनी मावळ्यांमध्ये ते स्फुल्लिंग निर्माण केले. तीनशे मावळे दहा हजार जणांच्या फौजेला छाती काढून सामोरे जाऊ लागले. 


कारण त्या दहा हजार जणांसमोर एक युद्ध जिंकून बायकांवर बलात्कार करणे आणि लुट करणे हे उद्दिष्ट होते. काफिरांना मारून त्यांच्या बायका भोगणे आणि त्यांची संपत्ती लुटणे हे त्यांचे धर्म कार्य होते जे त्यांच्या तरस प्रवृत्तीला पूर्ण साजेसे होते.


या उलट त्यांच्याशी लढणारे मावळे आई भवानीचे, महादेवाचे अनुयायी म्हणून लढायला उभे राहात होते. त्यांच्या चित्तातील अग्निकुंड प्रज्वलित झालेले होते. या लढाईत आम्ही जिंकू किंवा मरू पण शत्रूला अद्दल घडवू मरेपर्यंत लढू आणि आम्ही हे ईश्वरी कार्य करतो आहोत त्यामुळे याचे फळ म्हणून आम्ही स्वर्गातच जाणार आहोत. 


हा संपूर्ण दृष्टीकोन बदल धर्मासाठी लढाई करताना घडतो. परिणाम डोळ्यासमोर आहे. पेशवे आणि नंतरचे छत्रपती कर्तुत्वात कमी पडले नसते तर आज हा देश हिंदूपदपादशाही झाला असता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नेमकी ठिणगी कशी प्रज्वलित केली हे ज्ञात असल्याने राजा भय्या असेल , योगीजी असतील किंवा अन्य कोणीही धर्मकार्यार्थ उभा राहिलेला कट्टर हिंदू महाराजांना आदर्श मानतो कारण त्यांच्या मार्गावर चालणे निश्चित यश देणारे आहे, आणि तोच सनातन मार्ग आहे. 

   


तुम्ही जे कार्य करणार आहात त्यासाठी अंतर्मन जागृत होणे आवश्यक आहे ही जागृती धार्मिक श्रद्धांच्या आणि परंपरांच्या माध्यमातून साधणे अधिक सोपे आणि सुलभ आहे. नेमका हा मुद्दा आजचे संघटन बनवताना आपण लक्षात घेत नाही. आपण सांस्कृतिक संघटन सारखे गोंडस शब्द वापरतो आणि मग लक्षावधी अनुयायी असूनही तरस आणि जंगली कुत्र्यांच्या पुढे आपण कमकुवत पडतो. 


म्हणून माझे उद्दिष्ट धर्म या पातळीवर आपण एक येणे, धर्मातील अद्वैत सिद्धांत या सगळ्या जातीयवादी विचारसरणीला तर्क या पातळीवर संपूर्ण उध्वस्त करू शकतो. एकदा हे अद्वैत मनात रुजले की भेदाभेद अमंगल हे पण पुनरुज्जीवित होते आणि मग समस्त हिंदूंचे ऐक्य हे स्वप्न न रहाता सत्यात उतरते. 


धर्म आणि तर्क या पातळीवर ज्यावेळी एखादा विचार आत्मसात होतो तो चिरकाल टिकतो. वारकरी संप्रदायात जात नाही. तिथे ते जातीभेद , लिंगभेद किंवा वयाचा भेद न मानता एकमेकांच्या पाया पडतात कारण एकमेकांच्या देहात असणाऱ्या त्या ब्रह्मतत्वाला त्यांनी केलेले ते वंदन असते. जातीभेद मुक्त सर्वसमावेशक असे समाजाच्या एकत्रीकरणाचे वारकरी मॉडेल डोळ्यापुढे असताना सुद्धा आपण अन्य प्रतीकांच्या मागे का धावतो आहोत हे अनाकलनीय आहे. 


मान्य आहे या संपूर्ण यंत्रणेचे एक शुद्धीकरण, नुतनीकरण आवश्यक आहे. पण ते करणे हे नवीन काही निर्माण करण्याच्या पेक्षा अधिक सोपे आहे. अन्य धर्मियांच्या धर्मान्धतेशी लढायचे असेल तर तुम्हाला धर्माचा आधार आवश्यक आहे इतकेच नाही तर धर्म या संकल्पनेला बाजूला ठेवून लढाई अपयशी होण्याची शक्यता जास्त आहे. 


या लेखाबद्दल एक आक्षेप येऊ शकतो की मी धर्म आणि त्यातून मिळणारी चेतना आणि त्यामुळे होत असलेले मंदिरे आदींचे संरक्षण हे मुद्दे मांडत असलो तरीही सोरटी सोमनाथ इतक्या वेळेस लुटले गेले आहे अन्य मंदिरे उध्वस्त झाली असे कसे? या देशात लक्षावधी मंदिरे होती आणि आहेत त्या पैकी उध्वस्त केलेली किती आहेत ? संख्येच्या प्रमाणात विचार केला तर हे नगण्य आहे. याचा अर्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आपले लोक लढण्यात कमकुवत ठरले असा होतो. इस्लामी राज्यकर्त्यांनी कितीही क्रूरपणा केला तरीही ते संपूर्ण देशातील हिंदूंना धर्मांतरित करण्यात अपयशी ठरले. 


याउलट पर्शियामध्ये शरणार्थी म्हणून १०० इस्लामी कुटुंबांनी आश्रय घेतला आणि १०० वर्षांनी संपूर्ण इराण मुस्लीम राष्ट्र झाले होते.  


आपण धर्माच्या बळावर टिकलो आहोत आणि धर्मकार्य करायचे आहे हिंदू एकत्र आणायचे आहेत या नावाखाली धर्माच्या पायाला हात घालू नका.. आपल्या कडे व्यवस्था अस्तित्वात आहे तिचेच शुद्धीकरण करा आणि समाजाला अधिक चैतन्यमय करा.


पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या... 


©सुजीत भोगले.

No comments: