Friday, June 11, 2021

दंडवतेंना दंडवत..अनुपम कांबळी , मुंबई

 दंडवतेंना दंडवत...!

अनुपम कांबळी , मुंबई


काही वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आम  आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर साध्या राहणीमानाचे मार्केटिंग केले होते. त्यातील फोलपणा नंतर उघडकीसदेखील आला. त्यावेळी अनेकांना अरविंद केजरीवाल यांच्या त्या साधेपणाचे कौतुक आणि अप्रूप वाटले. कारण त्यांच्यातील बहुतांश लोकांना मधु दंडवते हे अजब रसायन माहितीच नव्हते. बसस्टॉपवर रांगेत उभे असलेल्या नानांचे कित्येक प्रत्यक्षदर्शींनी दर्शन घेतलेले आहे. आपण या देशातील महत्त्वाचे नेते आहोत म्हणून बसच्या पुढच्या दरवाजाने चढण्याची सवलतदेखील या तत्त्वनिष्ठ व्यक्तीने कधी घेतली नव्हती. मधु दंडवते हे देशाचे अर्थमंत्री होते. हे पद गेल्यानंतर ते एका बँकेत जेव्हा चारचाकी गाडीसाठी कर्ज काढायला गेले, तेव्हा तिथला अधिकारी आवाक झाला. देशाचे अर्थमंत्रीपद भूषविलेला नेता गाडीसाठी बँकेत कर्ज घ्यायला येतो हे चित्र या देशात पुन्हा कधी दिसेल असे मला तरी वाटत नाही.  


कणकवली रेल्वेस्टेशनहून मुंबईला प्रवास करत असताना किंवा प्रवास करून आल्यावर मी जिन्याजवळ मधु दंडवतेंचे जे तैलचित्र आहे, त्याला दोन्ही हात जोडून प्रणाम केल्याशिवाय कधीच पुढे जात नाही. तो प्रणाम एवढ्यासाठीच असतो की- आज या कोकण रेल्वेने मी जो काही प्रवास करतोय, तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे...! एका कर्मयोग्याप्रति व्यक्त केलेली ती कृतज्ञता असते. राजापूर मतदारसंघाचे खासदार असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचे अकस्मात निधन झाल्याने अहमदनगरचे प्राध्यापक मधु दंडवते यांना पक्षाने थेट कोकणातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. निकष फक्त एकच होता- तो म्हणजे नाथ पै यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेली विद्वत्ता...! काहीही झाले तरी कोकणची जनता लोकसभा निवडणुकीत मतदान करताना एका विद्वान उमेदवारालाच मत देणार, हा पक्षाला असलेला विश्वास...!! तो काळ इंदिरा गांधी यांचा होता. संपूर्ण देशात 1971 मध्ये इंदिरा गांधी यांची लाट आलेली असताना त्यांनी शेंदूर फासलेला दगडदेखील निवडून येत होता. महाराष्ट्रदेखील याला अपवाद नव्हता. इंदिरा लाटेत कॉँग्रेसचे 48 पैकी 47 खासदार निवडून आले... फक्त एकच खासदार जनता दलाचा निवडून आला... आणि तो खासदार म्हणजे आदरणीय मधु दंडवते...!


कोकणची जनता कोणत्याही लाटेत वाहवत जात नाही, हे त्या वेळी इंदिरा गांधींना आम्ही दाखवून दिले होते. अगदी अलीकडे नरेंद्र मोदी यांची लाट आली. त्या वेळी विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतल्यानंतरही सर्वच्या सर्व सहा जागांवर भाजपचा पराभव झाला. त्या वेळीसुद्धा कोकणी माणूस हाच संदेश देत होता की- ज्याची देशात लाट असते, त्याचीच आम्ही कोकणात खाट घालतो...! कोणत्याही नेत्याचा उधळलेला वारू थोपवून दाखवण्याची ताकद या कोकणच्या मातीत आहे. थोडक्यात, अहमदनगरचे मधु दंडवते कोकणात निवडून आले आणि नंतर ते कधी कोकणी झाले, ते त्यांनासुद्धा कळले नाही. त्या काळी मधु दंडवते हा कोकणी जनतेचा स्वाभिमान होता आणि आजही आहे. त्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्याप्रमाणे संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करून राजापूर मतदारसंघाची ओळख ‘विद्वान लोकांचा मतदारसंघ’ अशी देशभरात सर्वदूर केली. आजही या द्वयींची भाषणे अभ्यासासाठी संसदेत जतन करून ठेवलेली आहेत.  


कालांतराने दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री झाले. अ.ब.वालावलकर यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते, परंतु आमचे नाना ते स्वप्न अक्षरशः दिवसरात्र जगले. दरी-खोऱ्यांतून रेल्वे शक्य नाही म्हणून याअगोदर कोकण रेल्वेच्या प्रस्तावावर अनेकदा फुली मारण्यात आली होती. मात्र जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा सहकारी आणि ई.श्रीधरन यांच्यासारखा ध्येयनिष्ठ इंजिनिअर यांना सोबत घेऊन नानांनी हे अशक्यप्राय स्वप्न साकार केले. कोकण रेल्वेची संकल्पना जेव्हा त्यांनी कोकणी जनतेसमोर मांडली, तेव्हा कोणताही विकासात्मक दृष्टिकोन नसलेल्या तत्कालीन विरोधकांनी नानांवर अगदी टोकाची टीका केली. ‘दंडवते सदा गंडवते’ या घोषणेपासून रस्त्यावर फिरणाऱ्या रोड रोलरवर ‘आली पहा आली... दंडवतेंची रेल्वे आली...’ या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होता. मात्र क्षमाशील असलेल्या या कर्मयोग्याने ही विखारी टीकादेखील अगदी हिमालयाप्रमाणे स्तब्ध राहून सहन केली. लोकसभेत विरोधक म्हणून इंदिरा गांधींवर शब्दांच्या धारदार अस्त्रांनी तुटून पडणारे नाना त्यांच्या अकस्मात निधनानंतर भावुक होऊन ‘राजीव गांधींना त्यांची आई आता कधीच मिळणार नाही’ असे उद्‌गार काढतात, तेव्हा या व्यक्तीच्या हृदयाची आणि विचारांची विशालता लक्षात येते. कोकण रेल्वेचे स्वप्न साकारल्यानंतर हे विरोधक काळाच्या ओघात गडप झालेत, परंतु मधु दंडवते हे कोकणच्या इतिहासात अजरामर झालेत. जेव्हा केव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात एक पान हे खास नानांसाठी राखीव असेल आणि त्यांचे नाव सुवर्णाक्षरातच लिहिले जाईल, यात तिळमात्र शंका नाही.


कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या नानांची कपाटे वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेली असत. ज्यांची कपाटे पैशांच्या थैल्यांनी भरलेली होती, त्या नेत्यांना कधीच पराभव पाहावा लागला नाही. मात्र कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न पूर्ण करणाऱ्या नानांचा 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कर्नल सुधीर सावंत यांनी पराभव केला. त्याच काळात नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झालेली असल्याने शिवसेनेची संघटना बळकट झाली होती. अशा परिस्थितीत शिवसेनेने वामनराव महाडिक यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देऊन मतांचे विभाजन केल्याने त्याचा फटका मधु दंडवतेंना बसला व सुधीर सावंत विजयी झाले. सलग पाच वेळा विजय मिळाल्यानंतर अचानकपणे झालेल्या या पराभवामुळे नानांना जबर मानसिक धक्का बसला होता. नेमकी त्याच वेळी त्यांना देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी  चालून आली होती. तेव्हा ‘मागच्या दरवाजाने (राज्यसभा) जाऊन मी पंतप्रधान होऊ इच्छित नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्या वेळी लालूप्रसाद यादव व अन्य नेत्यांनी त्यांना ‘बिहारमधला कोणताही मतदारसंघ निवडा, आम्ही तुम्हाला निवडून आणून लोकसभेवर पाठवतो’ अशी खात्री दिली. तेव्हा तत्त्वांच्या या पुजाऱ्याने जे उत्तर दिले, ते ऐकून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणारा कोकणी माणूस मनातून हळहळला. नाना प्रांजळपणे म्हणाले- ‘माझ्या लोकांनी मला निवडणुकीत नाकारले, त्यामुळे देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याचा नैतिक अधिकारच मला प्राप्त होत नाही.’ आजच्या या बाजारू राजकारणात नानांसारखी नैतिकतेची व्याख्या सांगणारा दुसरा पुढारी शोधून तरी सापडेल का...?


आपली तत्त्वे आणि नैतिकता जपण्यासाठी त्यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडले, अन्यथा एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला असता. त्यानंतर 1996 च्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या जनतेचे लोकसभा निवडणुकीत विद्वान उमेदवाराप्रति असलेले आकर्षण पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पेशाने सीए व सारस्वत बँकेचे चेअरमन असलेल्या सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली. या वेळी सुरेश प्रभूंनी सुधीर सावंत व मधु दंडवते या दोघांचाही पराभव केला. त्या वेळी निकालादिवशी सुरेश प्रभूंना विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी लगेचच शेजारी उभे असलेल्या मधु दंडवतेंची भेट घेत त्यांच्या चरणांना वाकून स्पर्श केला. मतांच्या गोळाबेरजेत आपण विजयी झालेलो असलो, तरी मधु दंडवते या व्यक्तीचे कोकणप्रति असलेले योगदान प्रभूंना चांगलेच माहिती होते. त्या वेळी नानांनी सुरेश प्रभूंचे अभिनंदन करून त्यांना आलिंगन देत म्हटले, ‘बॅरिस्टर नाथ पै व मी आम्ही दोघांनी संसदेत जपलेला या मतदारसंघाचा लौकिक तुम्ही कायम राखाल याची मला खात्री आहे. आज तुमच्या रूपाने या मतदारसंघाला पुन्हा एकदा विद्वान खासदार मिळाला आहे.’


 आपल्या साधेपणाचे कधी मार्केटिंग करावेसे मधु दंडवतेंना वाटले नाही, कारण तो त्यांच्या रक्तातीलच एक गुण होता. अशा अवलिया नेत्याने कधी काळी माझ्या मतदारसंघाचे सलग पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते, हे सांगताना माझी छाती निश्चितपणे अभिमानाने भरून येते. सुरेश प्रभूंनी रेल्वेमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देण्यासाठी मी जेव्हा कॉल केला, तेव्हा माझ्या त्यांच्याकडे दोनच प्रमुख मागण्या होत्या.


पहिली म्हणजे, सावंतवाडीला रेल्वे टर्मिनस करा आणि त्या टर्मिनसला कोकण रेल्वेच्या शिल्पकाराचे- म्हणजेच मधु दंडवतेंचे नाव द्या. सुरेश प्रभूंनी पहिली मागणी पूर्ण करून सावंतवाडी टर्मिनसचे काम सुरूदेखील केले पण त्या टर्मिनसला मधु दंडवतेंचे नाव द्यायला ते आज रेल्वेमंत्रिपदावर राहिले नाहीत. ती जबाबदारी आपणा सर्वांना पार पाडावी लागेल. ज्या काळात लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत सिद्धांतावर घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत... ज्या काळात लोकशाही व राजकीय नेतेमंडळींवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय... त्या पिढीला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना ‘दंडवते कोण होते’ हे समजणे नितांत गरजेचे आहे. राजकारणात राहूनही नि:स्पृहपणे काम करता येते, हे पुढच्या पिढ्यांच्या मनावर ठसवून देण्यासाठी त्यांना मधु दंडवते कोण होते हे माहिती असणे नितांत गरजेचे आहे. ज्यांचे चरणस्पर्श घेऊन कृतकृत्य होता यावे, अशा फारच थोड्या व्यक्ती या भूतलावर होऊन गेल्या. त्यात फक्त राजकीय क्षेत्राचा विचार केला असता अशा व्यक्तींची संख्या ही नगण्यच होती. आता एकंदरीतच ज्या वेगाने राजकारणातून नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे, ते पाहता, मधु दंडवते हे त्या थोर व्यक्तींच्या यादीतील शेवटचेच नाव म्हणावे लागेल. आदरणीय नानांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!!

No comments: